उन्हाळ्यातील विहार…

दिवसभरच्या रणरणत्या उन्हात फिरावं लागल्यामुळे सुरेश पूर्णतः वैतागून गेला होता. सततच्या घामाच्या धारांनी थबथबला होता. उन्हाच्या काहिलीनं रोजचा दिवस सहनशक्तीचा अंत पाहणारा ठरत होता. ‘या जगात इतके शोध लागत आहेत, मग अजून हँडी फॅन किंवा ए.सी.चा शोध का लागत नाही ?’ रोजच्या त्रासातून निर्माण झालेले सुरेशचे हे उद्गार !

या ऋतूतील सूर्यसंतापाला तोंड देण्यासाठी आपण सगळेच सुरेशप्रमाणेच ‘गार’ वातावरणाला आसुसलेलो असतो. ग्रीष्म ऋतुचर्येतील विहारातही हाच महत्त्वाचा मुद्दा ग्रंथात मांडला आहे. त्या दृष्टीने पंखे, कूलर्स, एअर कंडिशन यांचा वापर आवश्यकच आहे. खोलीत गारवा राहण्यासाठी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावेत. या पडद्यांवर पाणी शिंपडल्याने अधिकच गारवा निर्माण करतो. काही व्यक्तींना पंख्याच्या किंवा कूलर्सच्या वाऱ्याने सर्दी होणे, अंग जड होणे असे त्रास होत असतात. अशा लोकांनी या वाऱ्याचा झोत प्रत्यक्ष अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हातून आल्यावर लगेच गार वातावरणात जाणे किंवा ए.सी.च्या वातावरणातून लगेच उन्हात जाणे या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कारण यात होणारा तापमानातील अचानक बदल शरीराला त्रासदायक ठरू शकतो.

पिण्याप्रमाणेच आंघोळीसाठीही गार पाणी वापरावे. शॉवर, टबबाथ अशा साधनांचाही या वेळी उपयोग होतो. गारवा सतत मिळण्यासाठी ओला रुमाल, नॅपकिन अंगावर गुंडाळावे. या सततच्या गार स्पर्शामुळे उकाडा सुसह्य होत असतो.

घराबाहेर पडताना रेशमी, सूती कपडे घालावेत. कपडे तलम कापडाचे व सैलसर असावेत. त्याचप्रमाणे सगळे गडद रंग उष्णता वाढवतात. म्हणून असे कपडे न वापरता सौम्य रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे या ऋतूमध्ये अधिक हितावह ठरतात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर अनिवार्यच ठरतो. उन्हाची तीव्रता डोळ्यांसाठी नेहमीच हानिकारक असते. याचसाठी न विसरता काळा गॉगल प्रत्येकाने वापरणे आवश्यक आहे. अर्थात, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे अधिकच चांगले.

उन्हातून घरी आल्यावर एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आल्या-आल्या लगेचच गार पाण्याने तोंड धुतो. असे करणे डोळ्यांच्या ताकदीच्या दृष्टीने अतिशय अपायकारक आहे. म्हणूनच उन्हातून आल्यावर काही काळ जाऊ द्यावा. शरीराचे तापमान कमी झाल्यावर मग गार पाण्याने चेहरा धुवावा.

ग्रीष्म ऋतूमध्ये शक्यतो व्यायाम टाळायला हवा. कारण व्यायामाने या काळात अधिकच थकवा येण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात पोहण्याचा व्यायाम घेणे उपयुक्त ठरते. त्यातही खूप न पोहता जमेल तेवढे पाण्यात डुंबत राहणे हितावह आहे. व्यायाम करावयाचा झाल्यास सकाळी, संध्याकाळी ऊन नसताना सावकाश चालण्याचा व्यायाम करावा. हेसुद्धा खूप वेळ करणे अपेक्षित नाही.

ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील रूक्षता वाढत असते. वातदोषाचा संचय, बलहानी यासुद्धा घटना घडतात, हे आपण पाहिले. या सगळ्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते, ती दुपारची झोप ! अन्य ऋतूमध्ये अनारोग्यकर दुपारची झोप या ऋतूमध्ये मात्र अवश्य घ्यावी. रात्री झोपतानासुद्धा मोकळ्या अंगणात, गच्चीवर चांदण्यात झोपावे. चांदण्याची शीतलता या काळात खूपच लाभदायी ठरत असते. चांदण्यात बसणे किंवा मोकळ्या हवेत फिरायला जाणे, असे उपक्रमसुद्धा नियमित करावेत.

उन्हाळ्यात चंदन, कापूर, नागरमोथा अशा थंड पदार्थांचा शरीरावर लेप लावावा. यामुळे उष्णता कमी होतेच. शिवाय ही सुगंधी द्रव्ये मनही प्रसन्न ठेवतात. यासाठी मोगरा, जाई, जुई अशा सुगंधी फुलांचाही वापर करावा. निरनिराळी अत्तरे, सेंटस्, डिओडोरन्ट्स यांचाही या ऋतूत ‘फ्रेश’ वाटण्यासाठी मुक्तहस्ते उपयोग करण्यास हरकत नाही.

डॉ . मयुरेश आगटे

उन्हाळ्यातील आहार

Grishma Rutu diet

‘डॉक्टर, चक्क तुम्ही दही खायला सांगताय !’ माझ्यासमोर बसलेल्या समीरच्या या वाक्यात कुतूहल आणि आश्चर्य दाटले होते. कारण लोकांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे ‘दही’ या अनेकांना प्राणप्रिय असलेल्या पदार्थांचा विरोधी पक्ष असाच समज असतो. म्हणूनच मी त्याला ‘उन्हाळ्यात दही खा’ असं सांगितल्यावर त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. ‘दही’ हा पदार्थ प्रत्येक वेळी निषिद्ध असतोच, असे नाही. किमान उन्हाळ्यातील ऋतुचर्येत तर तो नक्कीच आक्षेपार्ह नाही.

दह्यासारखे आंबट, स्निग्ध गुणाचे पदार्थ आपली चव आणि भूक वाढवतात. शरीरातली रूक्षताही कमी करतात. म्हणूनच दही किंवा दहीसाखर या काळात आवर्जून घ्यावे. दह्याप्रमाणेच आंबट चवीचा असा मोरांबासुद्धा घेण्यास हरकत नाही. आमसुलाचे सारसुद्धा उन्हाळ्यात उपयोगी आहे. टोमॅटोचे सूप हादेखील असाच एक उपयुक्त पदार्थ ! टोमॅटोचा सॉससुद्धा या काळात सेवन करावा. आंबटगोड चवीचे ताकही नियमित घ्यावे.

निसर्गसुद्धा या काळात करवंदे, कैरी, कोकम अशी आंबट चवीची फळे पुरवत असतो. कैरीचे लोणचे किंवा कायरस करून घ्यावा. नुसती कैरी मिठाबरोबर खाण्यानेही फायदा होत असतो. कोकम सरबत हा तर या काळातला सर्वमान्य पदार्थ !या काळात आंबट असलेली आणखी दोन उपयुक्त फळे म्हणजे लिंबू आणि आवळा ! लिंबाचे लोणचे, लिंबाचे सरबत घ्यावे. आवळासुद्धा मोरावळा स्वरूपात खूपच फायदेशीर आहे. आवळा अतिशय थंड असल्याने आवळ्याचे सरबतसुद्धा घरात असावे. कैरी, लिंबू किंवा अन्य पदार्थांच्या लोणच्यांच्या सेवनामुळे त्यांच्यातीलआंबटपणा व खारटपणा दोन्हीचा फायदा या काळात शरीराला मिळत असतो. गाजर, फ्लॉवर अशा भाज्यांचे ‘मिक्स व्हेज’ लोणचेदेखील घेता येईल.

या ऋतूत भाज्यांमध्ये चाकवत, पालक, चुका, माठ, तांदुळजा, राजगिरा अशा पालेभाज्या असाव्यात. बटाटा, सुरण, बीट, रताळी, गाजर यांसारखी कंदमुळेही आहारात घ्यावीत. भेंडी, पडवळ, दोडका, घोसाळी, तोंडली, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्यांचाही समावेश जेवणात असावा.

जेवणामध्ये डाळीचे पदार्थ शक्यतो टाळावेत. कारण बहुधा सर्वच प्रकारच्या डाळी रूक्षता वाढवतात. त्यातल्या त्यात वापरच करावयाचा झाल्यास मुगाची डाळ वापरावी. कारण तुलनेने ती कमी रूक्ष आहे. शिवाय थंड गुणाची असल्याने उन्हाळ्यात अधिकच फायदेशीर आहे.

शरीराला स्निग्धता पुरवण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकात तेलाचा वापर किंचित अधिक प्रमाणात करायला हवा. याच हेतूने साजूक तुपाचे असलेले महत्त्व आपण पूर्वी पाहिलेच आहे.ग्रीष्म ऋतूमध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणूनच शक्यतो या काळात पचायला जड असणारा मांसाहार टाळलेलाच बरा ! मांसाहार करावयाचा झाल्यास मासे, कोंबडी, खेकडा यांचे मांस घ्यावे, तेही अल्प प्रमाणात ! मांसाहार करण्यापेक्षा नुसते मटन किंवा चिकन सूप घेणे या काळात अधिक चांगले ठरते.

ग्रीष्म ऋतू बाधू नये, यासाठी अतिशय उपयोगी पडणारा आहारीय पदार्थ म्हणजे ‘कांदा’ ! कांदा अतिशय थंड गुणाचा असल्याने त्याचा समावेश आहारात करायलाच हवा. कांदा नुसता खाणे किंवा भाजून खाणे हितावह आहे. अन्य पदार्थांबरोबर कांदा शिजवून खाण्यासही हरकत नाही. कांद्याची कोशिंबीर हा चविष्ट पदार्थही जेवणात वरचेवर असावा. या सगळ्या आहाराप्रमाणेच उन्हाळ्यात महत्त्वाचा असतो तो ‘द्रवाहार’! त्याविषयी आणि उन्हाळ्यातील वर्ज्य पदार्थांविषयी चर्चा आपण ‘उन्हाळ्यातील पेयपान‘ या लेखात केलेले आहे.

डॉ . मयुरेश आगटे

उन्हाळ्यातील पेयपान

उन्हाळ्यात सतत तहान लागते. साहजिकच त्याच्या पूर्ततेसाठी आपणांस काही ना काही प्यावेसे वाटते. त्यात मुख्य गरज असते ती ‘पाण्याची’ ! या ऋतूत गार पाणी प्यावेसे वाटते. यासाठी मातीच्या माठात साठवलेले पाणी वापरावे. फ्रीजसारख्या साधनांचा वापर करून गार केलेले पाणीही आपण वापरतो. पण माठातल्या पाण्यापेक्षा हे पाणी पचण्यास जड असते, हे लक्षात घ्यावयास हवे. बर्फासारख्या पदार्थांचा उपयोग केलेले गार पाणी पिण्यासही हरकत नाही. पाण्यात वाळा टाकल्यासही त्याचा थंडावा वाढतो. वाळ्याप्रमाणेच चंदन, गुलाब, मोगरा, जाई-जुई, पारिजातक(स्वच्छ आणि रसायनमुक्त) इत्यादी सुगंधित फुलांचा संस्कार केलेले थंड पाणीही खूपच लाभदायी ठरते.

पाण्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना साक्षात विहिरी, तलाव यांमधून पाणी घ्यावे लागते, त्यांनी असे पाणी चांगले उकळून मगच वापरावे. कारण उन्हाळ्यात असे पाणी दूषित असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हल्ली पॅकबंद मिळणारे पाणी दर्जेदार असेल तर वापरणे स्वागतार्हच आहे.

तहान भागवण्यासाठी पाण्याप्रमाणेच निरनिराळ्या पेयांचाही उत्तम उपयोग होतो. पन्हे, वाळा, कोकम, लिंबू आदी सरबते, ताजी नीरा, लस्सी, शहाळ्याचे पाणी अशी सगळीच पेये या ऋतूमध्ये वारंवार घ्यावीत. या ऋतूत मिळणारा उसाचा रस हे सुद्धा उत्तम पेय आहे. उसाच्या रसात आले, लिंबू टाकल्याने तो चविष्ट बनतोच, शिवाय तो पचायलाही सुलभ होतो. अर्थात, यापैकी कोणतेही पेय घराबाहेर घेताना त्यांचा दर्जा, त्या ठिकाणची स्वच्छता आदी गोष्टी आरोग्यकारक आहेत याची खात्री करून घ्यावी.

निरनिराळ्या फळांचे रस हेसुद्धा या काळात भरपूर घ्यावेत. टरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे, सीताफळ, रामफळ, डाळिंब, केळी अशी फळे रस स्वरूपात किंवा नुसती खाण्यासही हरकत नाही. विविध फळांचे जाम, जेली यांचाही समावेश आहारात असावा. फळांचे स्क्वॅशसुद्धा जरूर सेवन करावेत.

ज्याची नुसती कल्पना केली तरी संपूर्ण उन्हाळा सुसह्य होतो, असे फळ म्हणजे ‘आंबा’! उन्हाळ्यात होणाऱ्या सगळ्या त्रासाची भरपाईच जणू निसर्गानं या फळांच्या राजाच्या रूपात केली आहे. या ऋतूत नुसता आंबा खाणे किंवा आमरस करून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. आंबा पोळी, आंबा बर्फी, आम्रखंड या स्वरूपातसुद्धा आंब्याचा समावेश करण्यास हरकत नाही. इतर फळांच्या तुलनेत आयुर्वेदानुसार आंब्याचे एक वैशिष्ट्य आहे. शिकरण, फ्रूट सॅलेड याप्रमाणे इतर फळे दुधाबरोबर एकत्र करणे आयुर्वेदास मान्य नाही. कारण अशा पदार्थांचे दीर्घकाल सेवन त्वचारोगांसारखे आजार निर्माण करते. याला अपवाद आहे ‘आंब्याचा’ ! आंबा आणि दूध एकत्र केल्याने मात्र कोणताच अपाय होत नाही. म्हणूनच या काळात मँगो मस्तानी, मँगो कुल्फी अशा विविध पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घ्यावयास हवा. आंबा हापूस, पायरी आदी विविध प्रकारांत मिळतो. आंब्याचे सगळेच प्रकार खाण्यास योग्य आहेत. यातही हापूसचा आंबा हा अधिक फलदायी आहे. गारवा निर्माण करणारी आइस्क्रीम्स, कुल्फी, मस्तानीसारखी पेयेसुद्धा या काळात अवश्य घ्यावीत.

उन्हाळ्यात जशा या गोष्टी सेवन कराव्यात, त्याचप्रमाणे काही पदार्थ हे चटण्या टाळावेत. टाळायलाच हवेत. या ऋतूत कोरडे पदार्थ उदाहरणार्थ – ब्रेड, मेथी, शेपू, शेवगा अशा भाज्या शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे त्या वर्ज्य कराव्यात. कारल्यासारखी भाजी शरीरात कोरडेपणा वाढवते. ताकदही कमी करते. डाळीचे पदार्थही असेच काम करतात. म्हणून हे सगळे पदार्थ आहारात नकोत. हिंग, मोहरी, ओवा, दालचिनी असे मसाल्याचे पदार्थही अतिशय उष्ण असल्याने त्यांचा उपयोग कमी प्रमाणात करावयास हवा. असाच आणखी एक वर्ज्य पदार्थ म्हणजे ‘लसूण’ ! मिरची, गरम मसाला, लाल तिखट यांचा वापरही जपून करावा. सुके किंवा भाजलेले मांससुद्धा या ऋतूमध्ये अपायकारक आहे. शिळे पदार्थ, आंबवलेले इडली, डोसा, ब्रेड यांसारखे पदार्थही कटाक्षाने टाळले पाहिजेत. बटाटेवडे, भजी असे तळलेले पदार्थही वर्ज्य करावेत.

डॉ . मयुरेश आगटे

सामना ग्रीष्माशी….

Grishma Rutu

गुढी पाडव्याला नववर्षाचं स्वागत अतिशय उत्साहाने केल्यानंतर चैत्र महिना सुरू होतो. यापुढचे दोन-अडीच महिने संपूर्ण भारतासाठी अतिशय कठीण कालावधी असतो. कारण या काळात असणारा उन्हाळा ! भारत हा उष्ण कटिबंधात असणारा देश. साहजिकच उन्हाळ्याची तीव्रता आपल्या देशात जास्त असतेच. त्यातच गेल्या काही वर्षांत वृक्षतोड, प्रदूषण अशा विविध कारणांमुळे उन्हाळ्याची तीव्रता सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आढळते. म्हणूनच यापुढचा काळ हा आग ओकणाऱ्या, भाजून काढणाऱ्या सूर्याशी सामना करण्याचा असतो. या संपूर्ण काळालाच ‘ग्रीष्म ऋतू’ असे म्हणतात. खरं तर ग्रीष्माची सुरुवात वैशाखापासून अपेक्षित असते. मात्र, सद्य:काळात हा वैशाखाचा वणवा चैत्रापासूनच भडकायला सुरुवात होते.

ग्रीष्मातील प्रखर, तीव्र सूर्यसंतापामुळे सृष्टी भाजून निघत असते. उष्णतेमुळे तलाव, निर्झर, ओढे आटतात. नद्या कोरड्या पडतात. सर्वत्र रूक्षता वाढायला सुरुवात होते. नेमके हेच चित्र सृष्टीतील घटक असणाऱ्या आपल्या शरीरातही दिसायला लागते. शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊन रूक्षता वाढायला सुरुवात होते. बाह्य वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णताही वाढते. असह्य उकाड्यामुळे सतत घाम येतो. या घामामुळेही शरीरातील पाण्याचा साठा सतत कमी होत असतो.

थंडीमध्ये घाम न आल्यामुळे शरीरातील उष्णता कोंडली जाते व त्यामुळे पचनशक्ती वाढते. उन्हाळ्यात बरोबर विरुद्ध घटना घडते. सततच्या घामाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर पडून त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या पचनशक्तीवर घडतो. त्यामुळे साहजिकच पचनशक्ती या ऋतूत कमी होते. बाह्य उष्णतेमळे शरीरातील बल कमी होते. त्यामुळे कोणतेही श्रम न करता थकवा, दौर्बल्य जाणवते. शरीरातील रूक्षता वाढत असल्याने वातदोषाचा संचयही या काळात घडत असतो. वाढणारी उष्णता, कमी झालेली पंचनशक्ती, निसर्गत:च होणारी बलहानी, साठणारा वातदोष या सगळ्यांचाच विचार करून या ऋतूतील आहारविहार ठरवायला लागतो.

या दृष्टीने जो काही आहार घ्यायचा तो पचायला हलका हवा. आहारात पोळी, भात, भाकरी यांचा समावेश असावा. भातासाठी लाल तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ वापरण्यास हरकत नाही. भाकरीसाठी ज्वारी, नाचणी यांचा उपयोग करावा. बाजरी ही त्यामानाने अधिक उष्ण व रूक्ष असल्याने भाकरीकरता बाजरीचा उपयोग टाळलेला बरा ! पोळीसाठी आपण गहू वापरतो. पोळीप्रमाणेच गव्हाचे फुलकेदेखील या ऋतूत जरूर घ्यावेत.

उन्हाळ्यात तिखट, कडवट, तुरट चवीच्या पदार्थांचा वापर कमी करावा. कारण असे पदार्थ शरीरातील रूक्षता अधिकच वाढवतात. शिवाय वातदोषाचा संचयही अशा पदार्थांमुळे वाढतो. त्याऐवजी आहारात गोड, आंबट, खारट पदार्थ अधिक असावेत. कारण हे पदार्थ वातदोष कमी करतात. गोड पदार्थांमुळे या ऋतूत होणारा बलक्षयही टाळला जातो. शरीरातील वाढलेली उष्णताही गोड पदार्थ कमी करतात. या दृष्टीने नुसत्या पोळीपेक्षा साखरेची पोळी किंवा शिऱ्याची पोळी आहारात असावी. भातामध्येसुद्धा साखर-भात, काश्मिरी पुलाव असे प्रकार घेण्यास हरकत नाही. आहारात दूध व दुधापासून तयार होणारे बर्फी, खव्याचे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी असे गोड पदार्थही जरूर घ्यावेत. मात्र, या ऋतूत पचनशक्ती कमी असल्याने त्यांचे प्रमाण भरपेट असे न घेता थोड्या कमी प्रमाणात घ्यावेत. त्यामुळे पचनशक्तीवर अधिक ताण पडत नाही. गव्हाची किंवा रव्याची खीर, शेवयांची खीर, शिरकुर्म्यासारखे पदार्थ यांचा आहारात वापर उपयुक्त आहे. नुसते मसाला दूध किंवा दूध-साखरसुद्धा जरूर घ्यावे. शरीरातील वाढणारी रूक्षता कमी करण्यासाठी दुधाप्रमाणेच उपयोग होतो तो ‘साजूक तुपाचा’ ! म्हणूनच या ऋतूमध्ये जेवणात नुसते तूप किंवा तूप- गूळ यांचा उपयोग करावा. तुपामुळे पचनशक्ती वाढते. सर्व शरीराला ताकद मिळते. अंगात वाढणारी उष्णता कमी होते. शरीरातला वातदोषही कमी होतो. दोन्ही जेवणांत किमान दोन ते चार चमचे साजूक तपाप्रमाणेच लोणी, साय-साखर असे पदार्थही आहारात असावेत.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना : हा आहार आयुर्वेदाचा विचार करून तयार केला आहे.  कोणत्याही प्रकारचा आजार असलेल्या व्यक्तींनी ह्या आहाराचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

गुढीपाडवा

Gudi Padwa

रंगपंचमीच्या विविध रंगांत न्हाऊन निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते नववर्षाच्या स्वागताचे ! भारतीय परंपरेप्रमाणे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ ! या दिवशी गुढीच्या रूपात नववर्षाच्या पहिल्या सूर्याचे स्वागत केले जाते. सकाळी लवकर उठून कडूनिंबाची पाने व साखरेची गाठी बांधलेली गुढी उभारून आपण नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतो आणि या आनंदात भर घालतो, पाडव्याच्या दिवशीचा घरातला एखादा गोड पदार्थ !

गुढीपाडव्याची ही परंपरा आपण शतकानुशतके पाळत आहोत. या परंपरेचा विचार करताना सहज लक्षात आलं की नववर्षाचं स्वागत करण्याची आपली परंपरा आणि इतर जगाची परंपरा यात प्रचंड फरक आहे. ३१ डिसेंबरला ‘ज्या’ पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं, तसं करणं आमच्या संस्कृतीलाही शक्य नव्हतं का ? एरवी आपण कोणाचंही स्वागत कडू पदार्थाने केल्याचं आठवत नाही. मग ज्याच्यावर संपूर्ण सृष्टीचक्र अवलंबून आहे, अशा सूर्याच्या स्वागताला साखरेच्या गाठींबरोबर कडू चवीचा कडूनिंब का वापरतात ? असा पदार्थ आपण इतर कोणत्याच सणावाराला वापरत नाही. मग नेमक्या गुढीपाडव्याला-वर्षाच्या पहिल्या दिवसाला असं आपण शेकडो वर्षं का करत आहोत ? जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, त्या वेळी त्याचे उत्तर सापडले ‘आयुर्वेदात !’

कारण गुढीपाडव्याची अशी परंपरा निर्माण करतानासुद्धा आरोग्याचा विचार प्रामुख्याने केला आहे. शरीर निरोगी असेल, तरच नववर्षाचे स्वागत आणि नववर्षाची सुरुवात आनंदाने करता येईल. ही सुरुवात निरोगी, आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीनेच कडूनिंब, साखर या पदार्थांची गुढीमध्ये वर्णी लागली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने

या परंपरेमागचे शास्त्रीयत्व आपण पाहणार आहोत:

चैत्रातल्या या प्रतिपदेपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन बराच काळ लोटलेला असतो. साहजिकच आता उन्हाची तीव्रता जाणवत असते. आगामी दोन-अडीच महिने ही तीव्रता अधिकच वाढणार असते. या वाढणाऱ्या उष्णतेचा सृष्टीतीलच एक घटक असणाऱ्या आपल्या शरीरावरही परिणाम घडतो. त्यामुळे वातावरणातील उष्णतेबरोबरच अंगातील उष्णताही वाढते. यातूनच अंगाची लाही होणे, उष्णतेमुळे घामोळ्या येणे किंवा अंगावर पुरळ उठणे अशा अनेकविध तक्रारी निर्माण होतात. शरीरात वाढणारी उष्णता रक्तालाही बिघडवण्याची शक्यता असते. यातूनच पिंपल्स, गळू होणे, उन्हामुळे नाकातून किंवा अन्य मार्गातून रक्तस्राव होणे असे त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात भूकही मंदावलेली असते. या सगळ्या आरोग्यास बाधा आणणाऱ्या प्रश्नांवर उत्तम उत्तर असते, ते म्हणजे ‘कडूनिंब’ !

कडू चवीचा कडूनिंब थंड गुणाचा असल्याने उष्णतेच्या सर्वच विकारांवर उत्तम औषध आहे. म्हणूनच चैत्र, वैशाख या उन्हाळ्याच्या काळात त्याचा वापर करावा. कडूनिंबाचे चूर्ण अंगाची आग कमी करते. रक्त शुद्ध करणारे उत्तम औषध असल्याने त्यामुळे त्वचेवर उठणारे फोड कमी होतात. घामोळ्यांमुळे होणारी आग कडूनिंब कमी करतो. त्याचप्रमाणे त्वचेला खाज सुटत असल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. उष्णतेमुळे शरीरातून रक्तस्राव होत असल्यास तो त्वरित थांबवण्याची ताकद कडूनिंबात आहे. कडूनिंबाचा यकृतावरसुद्धा चांगला परिणाम होतो. त्यामुळे यकृताचे कार्य सुधारून या काळात निसर्गत:च कमी होणारी भूक वाढण्यास उपयोग होतो. पोटात आग पडणे, अम्लपित्त या आजारातही त्याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात अनेकदा अन्न बाधते. विशेषतः बाहेरचे पदार्थ खाल्ल्यावर असा त्रास अधिक होतो. असा त्रास कमी करण्याकरताही कडूनिंब उपयुक्त आहे. म्हणूनच या काळात त्याचे महत्त्व आहे.

गाठींमध्ये असणारी गोड चवीची साखरसुद्धा कडूनिंबाच्या कामाला उपयुक्त ठरत असते. या साखरेच्या गोडव्यामुळे शरीराचा थकवा दूर केला जातो. साखरेची गाठी चघळल्याने तोंडाला कोरड पडणे, वारंवार तहान लागणे अशी लक्षणेही कमी होतात. साखरेचा गोडवा शरीरातील सर्व पेशींना टवटवीतपणा आणतो. कडूनिंबामुळे शरीरात वातदोष वाढण्याची शक्यता असते. साखरेमुळे त्याचा प्रतिबंध होतो. खरं तर गोड पदार्थ पचायला जड असतात, पण साखर गोड असूनही त्याला अपवाद आहे. म्हणूनच या ऋतूमध्ये तिचे सेवन त्रासदायक ठरत नाही. या सगळ्या आरोग्यदायी घटकांचा विचार ‘गुढी’च्या परंपरेत आहे. आपल्या अशा सगळ्याच परंपरा शतकानुशतके टिकून आहेत. कारण त्याला शास्त्रीय आधार आहे म्हणून !

डॉ . मयुरेश आगटे

होळी ,धूलिवंदन , रंगपंचमी

Holi

आयुष्याच्या कॅनव्हासवर आपण खरं तर रोज तेच तेच चित्र काढत असतो. आपलं रोजचं आयुष्य इतकं चाकोरीबद्ध असतं की, त्याचा अधून-मधून कंटाळा यायला लागतो. अशा नेहमीच्या चित्रात आनंदाचे वेगवेगळे रंग भरतात ते रंगपंचमीसारखे सण ! ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ असं म्हणत साक्षात भगवान श्रीकृष्णापासून खेळली जाणारी ‘रंगपंचमी’ आणि आपलं मातीशी असणारं नातं अधिकच दृढ करणारं ‘धूलिवंदन’ असे दोन सण आपण वसंत ऋतुमध्ये साजरे करतो. या निमित्ताने या रंगीबेरंगी सणांविषयी आपण गप्पा मारणार आहोत.

खरं तर रोजच्या जीवनात आपण स्वच्छतेकडे लक्ष देत असतो. आपल्या घरात कोठेही धूळ साठणार नाही, याची दक्षता घेतो. बाहेरून घरात आल्यावर हात- पाय स्वच्छ धुतल्याशिवाय आपण इतर कोणतेही काम करत नाही. यामागेही हातपायाला लागलेली धूळ, माती, इतर अस्वच्छ गोष्टी निघून शरीर स्वच्छ व्हावे हाच हेतू असतो. लहान मुलांमध्ये तर याबाबत खूपच काळजी घेतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, एरवी स्वच्छतेची एवढी काळजी घेणारे आपण धूलिवंदनाला बरोबर उलटे आचरण का करतो ? या दिवशी तर पाण्यात चिखल किंवा माती कालवून ती एकमेकांच्या अंगाला लावतो. इतकंच नव्हे, तर दिवसभर ती मिरवतोसुद्धा !

असा सण याच काळात साजरा करण्यामागेही शास्त्रीय कारण लपलेले आहे. फेब्रुवारी महिन्यातील वसंत ऋतूमध्ये ऊन वाढायला सुरुवात होते. मार्च महिन्यात ही उन्हाची तीव्रता अधिकच जाणवायला लागते. वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यामुळे आपल्या अंगातील उष्णता वाढून अंगाची लाही होणे असे त्रास सुरू होतात. अशा वेळी अंगाला गारवा मिळावा, यासाठी उपयोगी पडते ती ‘माती ! माती मुळातच थंड गुणाची असते. त्यात पाणी मिसळल्यावर त्यात अधिकच गारवा निर्माण होतो. अशा रीतीने ‘थंड गुणाचा’ चिखल अंगावर लावल्यामुळे त्वचेवर गारवा निर्माण होतो. दाहापासून त्वचेचे संरक्षण होते. उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ उठणे, फोड येणे असे त्रास उत्पन्न झाल्यासही त्याचा उपयोग होत असतो. अर्थात, यासाठी वापरावयाची माती दगड, मुरूम, रेती असे पदार्थ नसलेली असावयास हवी. माती घेताना मुलायम, फारशी चिकट नसलेली घेणे अपेक्षित आहे. माती खूप चिकट असल्यास त्यात थोडी रेती मिसळावी. त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होऊन त्वचेवर लेप लावणे सोपे जाते. माती घेताना त्यात प्राण्यांचे मल, मूत्र, केरकचरा नसावेत.

या ऋतूत जसा या मातीच्या लेपाचा उपयोग होतो, तसाच अनेक व्याधींतही चिकित्सा म्हणून उपयोग केला जातो. निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीमध्ये याचा विशेष उपयोग करतात. विशेषतः पित्ताच्या व्याधीमध्ये हे विशेष लाभदायी आहे. जेव्हा पित्तामुळे शिरःशूल असतो, त्या वेळी कपाळावर असा लेप करावा. त्वचेवर मुका मार लागून येणारी सूज व वेदना कमी करण्यासाठी मातीचा लेप लावतात. त्वचा भाजली असता होणारा दाह ओल्या मातीमुळे थांबतो. पोटदुखीमध्ये नाभिप्रदेशी असा लेप फायदेशीर आहे. संधिशूल, पक्षाघात अशा व्याधींमध्ये काही वेळा ओझोनमिश्रित ओल्या गरम मातीचा उपयोग केला जातो. मातीचा लेप साक्षात त्वचेवर लावतात किंवा कापडाच्या घडीमधील दोन पदरांत मातीचा थर ठेवतात व ती कापडाची पट्टी जरूर तेथे त्वचेवर ठेवतात. अर्थात, जेव्हा व्याधीसाठी ही चिकित्सा करायची असते तेव्हा वैद्यकीय सल्ल्यानेच करणे इष्ट आहे.

या ऋतूमध्ये उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी दुसरा आवश्यक पदार्थ म्हणजे ‘पाणी’ ! अंगावर पाणी शिंपडल्याने उन्हामुळे तडकणाऱ्या त्वचेचे रक्षण होते. अंगावर शीतलता निर्माण होते. उन्हामुळे सगळ्यांनाच थकवा येतो. अंग गळून जाते. कामाचा उत्साह राहात नाही. अशा वेळी पाण्याच्या स्पर्शामुळे तजेला येतो. त्वचेवर सतत येणारा घाम चिकटून न बसता निघून जातो आणि हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, म्हणूनच आपण ‘रंगपंचमी’ साजरी करतो. शरीराला आवश्यक असणारी पाण्याची गरज भागवणे हा त्याचा प्रमुख हेतू आहे. त्यात रंगांची उधळण अधिकच आनंद निर्माण करते. म्हणूनच या काळात हा सण आपल्या परंपरेने समाविष्ट केला. या संदर्भात एक महत्त्वाची काळजी घेणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ते म्हणजे हल्ली रंगांचा होणारा वापर. अनेकदा बाजारातील रंगांमध्ये हानिकारक केमिकल्स असतात. त्यांचा संपर्क आल्यामुळे त्वचेवर अॅलर्जी होणे, फोड येणे असे त्रास होतात. रंग डोळ्यांत गेल्यास या नाजूक अवयवालाही इजा होण्याची दाट शक्यता असते. असे रंग वापरणे टाळायलाच हवे. त्याऐवजी हळद, सोनकाव, मंजिष्ठा, केशर अशा सुरक्षित पदार्थांचा नक्कीच वापर करता येईल.

म्हणूनच पाण्याचा उपयोग पाणी शिंपडणे, ओले कापड अंगावर गुंडाळणे, टबबाथ यांसारखी साधने वापरूनही करता येईल. किंबहुना पाण्याची बचत ही काळाची गरज असल्याने पाण्याचा अनावश्यक खर्च या साधनांमुळे निश्चितपणे टाळता येईल. अशा रितीने ‘शास्त्रशुद्ध’ आधार असणारे हे सगळे सणवार आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतातच. पण त्यात आरोग्य टिकवणे हादेखील मुख्य उद्देश असतो.

डॉ . मयुरेश आगटे

वसंत ऋतूमधील पथ्यापथ्य…

Diet in Vasant Rutu

सदाबहार वसंत ऋतूमधील अपेक्षित आहाराचा विषय आपण पाहात होतो. या काळात पचायला हलका असा आहार हवा. आहारात कडू,तिखट, तुरट पदार्थांचे प्रमाण अधिक असणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात होणारा कफप्रकोप कमी होतो.

या पदार्थांप्रमाणेच या ऋतूत दूध, ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरताना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो. ते पचायलाही हलके होते. या ऋतूत होणारा बलाचा ऱ्हास कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग, जिरे, चाट मसाला असे पदार्थ टाकण्यासही काहीच हरकत नाही. दही हे कफवर्धक असल्याने त्याचा वापर टाळायला हवा. तसेच साजूक तुपापेक्षा तेलाचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

आहारात मांसाहाराचे प्रमाण या काळात कमी असावे. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मांस तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटण किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले ! सूपमध्ये हिंग, जिरे आदी मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत. मांसाहारासाठी मासे, खेकडा अशा प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये. मांसाहाराप्रमाणेच पक्वान्ने, मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे.

बाह्य वातावरणात उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते. पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधले किंवा माठातले पाणी, बर्फाचा वापर, आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळायला हवा. कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातला अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो व त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते.

फ्रीजमधील अन्नपदार्थसुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत. रूमच्या तापमानानुसारच सेवन करावेत. अर्थात, फ्रीजमधील पदार्थ या ऋतूत टाळलेलेच अधिक चांगले !

गार पदार्थांप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअरकंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सात्म्य होण्याच्या दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अंगावर साक्षात लागणार नाही, अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशनसुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे, ए.सी. यांचा वापर त्यांच्या बाबतीत जपूनच करायला हवा.

या ऋतूत दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले, तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हाददायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभरच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा. मात्र, थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे. अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता या काळात असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे, सेंटस्, डिओडोरन्ट्स यांचाही जरूर वापर करावा. या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. उन्हामुळे येणारा ‘मानसिक’ थकवा त्यामुळे टाळता येतो. दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो. काही काम करण्याचा फारसा उत्साह राहात नाही. पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतूत निश्चयाने टाळायला हवे. कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तत्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य स्वास्थ्याकरता आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते

डॉ . मयुरेश आगटे

Diet in Vasant Rutu

Diet in Vasant Rutu

Let’s look at the recommended diet to be consumed during this evergreen spring season. During this time, it is better to consume foods that are easy to digest. We must include more bitter, spicy, Turat (sour, taste of Amla is Turat) foods in our diet. This reduces “Pitta Prakop”(outbreak of Kapha) during this period.

Milk and buttermilk should be consumed in this season. Milk must be boiled or heated before consuming. This reduces the “Kapha” enhancing property. It also becomes easy to digest and reduces the loss of strength in this season. Asafoetida, Cumin and Chaat masala can be added to buttermilk. Curd is “Kapha” enhancing and should be avoided. Also, it is preferable to use more of oil than pure ghee.

We should consume meat in low quantities during this season. Since the meat of Goat, Sheep and Chicken is relatively easy to digest, these can be included in the diet. It is better to consume Mutton and Chicken soup, rather than meat. Spices such as Asafoetida and Cumin should be added to it. Fish and Crab should not be consumed during this period. Like non vegetarian food, desserts and sweets must also be consumed in limited quantity.

As the heat in the environment increases, we tend to crave cool foods. However, in the beginning of Vasant Rutu, we must avoid having cool water directly from the fridge or from earthen pot, ice and ice cream. When we suddenly start consuming these cool foods, it adds to the “Kapha” which is already increased in the body. Hence the possibility of catching diseases such as cold, cough and fever increases.

Food items stored in the fridge must not be consumed directly. It should be kept outside for some time before consuming. Avoid sitting directly under the blow of the fan or air conditioner as this might lead to the outbreak of “Kapha”. Minimum use of air conditioners is recommended. Since small children tend to catch a cold and cough easily, care must be taken regarding the usage of fans and air conditioners.

In this season, the afternoons are very hot. However, the mornings are pleasantly cool. Hence, waking up early in the morning gives us the energy required for the entire day’s work. It is advisable to wake up early and exercise. The exercise must be slightly less rigorous than in winter. More exercise can leave us very tired during this period. After exercise, we should take a warm bath. After bath, apply Chandan, Keshar Lep (coating). Use different types of perfumes, scents, and deodorants. The fragrance from these perfumes refreshes the mind. It also prevents mental fatigue caused by the sun’s heat. This heat from the sun makes us feel lethargic. We lack the enthusiasm to go about our work. Nevertheless, sleeping in the afternoons must be avoided, as this increases the diseases caused by “Kapha”. It also impacts digestion. All these guidelines are essential in order to maintain our good health. Otherwise, the chances of catching various diseases increases.

Dr Mayuresh Aagte

आला, वसंत ऋतू आला…

Spring season - Vasant Rutu

हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते. त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. आंबा, फणस अशा वृक्षांना मोहोर येतो. बकुळीसारख्या फुलांचा सुगंध दरवळू लागतो. यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कूजनाची ! मित्रांनो, सृष्टीला नवचैतन्य देणारा हा ‘ऋतुराज’ म्हणजे ‘वसंत ऋतू !’ आपल्या आरोग्य प्रवासात आपण आता ‘वसंत ऋतुचर्ये’चे वळण घेणार आहोत.

हा वसंत ऋतू बाह्यसृष्टीप्रमाणेच आपल्या शरीरातसुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफदोष गोठलेल्या स्वरूपात असतो. वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्याप्रमाणेच शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने त्या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळूहळू वाढणाऱ्या उष्णतेने शरीरातील बलाचा ऱ्हास होण्यास वसंतात सुरुवात होते. वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे, उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते.

या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यावयास हवा. गव्हाची पोळी, ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणारा असल्याने त्याचे प्रमाण कमी असावे. गहू, तांदूळ, ज्वारी आदी धान्ये वापरताना ती जुनीच वापरावीत. नवीन धान्ये कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा. नवीन धान्य वापरणे अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे. असे भाजून घेण्यामुळे त्यांच्यातील कफ वाढवण्याचा गुणधर्म कमी होतो. शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके बनते.

या ऋतूमध्ये तिखट, कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात. कडू, तिखट पदार्थांचा उपयोग भूक वाढवण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची, पुदिना, लसूण, हिंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा मुक्तहस्ते वापर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. तांदुळजा, पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात समावेश असावा. कारले, मेथी अशा कडू चवींच्या भाज्यांचा या ऋतूत नित्य वापर करणे हितावह आहे.

तूर, मूग, मसूर अशी कडधान्ये कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी, मुगाचे लाडू असे पदार्थ करून खाण्यासही हरकत नाही. कुळथाचे कढण, कुळथाचे वरण, कुळथाचे पिठले अशा विविध स्वरूपात कुळथाचा वापरही उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थही आहारात असणे लाभदायी आहे.

फळांमध्येसुद्धा तुरट रसाची फळे हितकर असतात. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती ‘कवठाच्या’ फळातून ! आपण एरवी कधीही कवठाची फळे खात नाही. पण ती तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंत ऋतूत त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्मांच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत. या काळात येणाऱ्या ‘महाशिवरात्री’ व्रतामध्ये म्हणूनच कवठाची फळे समाविष्ट झाली. त्या निमित्ताने या फळांचे सेवन घडते. कवठाचा गर नुसता खाणे, कवठाच्या गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात.

महाशिवरात्रीला कवठाचीच फळे घेण्यास जसे ‘शास्त्रीय’ कारण आहे, तसेच त्या दिवशी उपास करण्यातही शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते. म्हणूनच त्यावर अधिक ताण यापुढच्या काळात देता कामा नये, याचे द्योतक म्हणून या दिवशी ‘उपवास’ करण्यात येतो. थोडक्यात, संपूर्ण वसंत ऋतूत कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

डॉ . मयुरेश आगटे

Spring has arrived…

Spring season - Vasant Rutu

All around us, nature is frozen in the cold and dark winter. Trees have become leafless. This situation lasts until mid-February, after which, the heat in the atmosphere starts to increase. The fresh tips of tender green leaves start sprouting from trees. Trees like mango and jackfruit start blossoming. The air is filled with the fragrance of flowers like Bakuli. Chirping of birds, especially the Cuckoo, singing merrily adds beauty to this enchanting weather! Friends, Spring season has arrived, the ‘Ruturaj’ (king of Rutu) which revives and restores mother earth!’ In our health journey, we will now look at this Rutu, “Vasant Rutu”(spring).

As the outside environment changes, changes begin to occur in our body as well. Due to the harsh cold winter, “kapha dosha” is accumulated in our body, which remains in a frozen state. In Vasant Rutu, this frozen “kapha” starts melting due to the increasing heat in the atmosphere. Just like ice is melted by heat, the same function occurs in our body. In Ayurveda this situation is called “Kapha Prakop”(outbreak of Kapha dosha). As the cold subsides, the digestive power which had increased during the cold season, now gradually begins to decline. In Vasant Rutu, the increasing heat in the atmosphere starts to reduce the strength of our body. Due to this, we start feeling tired and experience lack of energy.

Considering all this, a diet that is easy to digest should be taken in this season. It is advised to consume roti/poli/bhakri made of Wheat, Jowar, Bajra or Ragi. Since rice increase “Kapha”, it should be taken in less quantity. When using grains like Wheat, Rice, Jowar, they must be from an older harvest. Newly harvested grains should be avoided as these tend to increase “Kapha”. If using newly harvested grains is inevitable, roast them before cooking. Such roasting reduces the “Kapha” enhancing properties in them. Moreover, the newly harvested grain also becomes lighter and easier to digest.

In this season, consume more of spicy, bitter and sour “Turat” (The taste of Amla is Turat). Such foods reduce “Kapha”. Bitter and spicy foods are also useful to increase appetite. Therefore, foods like Ginger, Chili, Mint, Garlic, Asafoetida, Pepper, Cinnamon, Bay leaf and Mustard seeds should be used freely in cooking. All kinds of spices are beneficial in this season. Vegetables like Chawali(Tandulja), Snake gourd (padwal), Brinjal, Drumstick and Radish should be included in the diet. It is beneficial to consume bitter vegetables like Bitter gourd and Fenugreek regularly in this season.

Pulses/Legumes like Tur, Moong and Masoor should be consumed as they reduce “Kapha” and are easy to digest. There is no harm in eating dishes like Moong dal khichdi and Moong laddoos. The use of Kulitha in various forms such as Kulitha kadhan, Kultha’s varan, Kultha pithal are also useful. It is also beneficial to include foods like Flaxseeds(jawas) and Niger((karale) seeds in the diet.

In fruits as well, ones that are of “Turat” taste are beneficial. Nature fulfills this need by producing fruits like ‘Kawath’. We generally do not consume this fruit in the other seasons. Since they are “Turat”, easy to digest and “Kapha” reducing, they can be used abundantly in Vasant Rutu. These properties of Kawath are more beneficial in its raw fruit form. Therefore, the fruits of Kawath are included in the ‘Mahashivaratri’ fast which is celebrated during this period. Consumption of this fruit is included as part of the ritual followed on “Mahashivaratri”. We can include Kawath in our diet in the form of Kavtha pulp , chatni or burfi.

Just as there is a ‘scientific’ reason behind consuming the fruits of Kawath on “Mahashivaratri”, there is also a ‘scientific’ reason for fasting on that day. During this time, the digestive power gradually begins to decline. Therefore, ‘fasting’ is done on this day as an indication that the digestive system should not be stressed further. Typically, it is important to enjoy the Kawath and control your diet throughout the spring season.

Dr Mayuresh Aagte