कोजागिरी पौर्णिमा आणि शरदाचे चांदणे

Kojagiri

दसरा, नवरात्र व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झेंडू, आपटा यांच्या पार्श्वभूमीवर आपण शरदऋतूविषयी गप्पा मारायला सुरुवात केली होती. आपल्या भारतीय परंपरांमागे असलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनाची झलक या निमित्ताने आपण पाहिली. याच शरद ऋतुसंदर्भात आपण आज गप्पा मारणार आहोत, ते शरदाच्या चांदण्याच्या ‘प्रकाशात !’

दिवसभर कडक उन्हामुळे ऑक्टोबर महिन्यात सगळेच त्रस्त झालेले असतात. पावसाळ्यातील गारव्याच्या पार्श्वभूमीवर तर हा उकाडा अधिकच जाणवत असतो. या उकाड्याने होणाऱ्या त्रासाची भरपाई निसर्ग करतो ती रात्री सुंदर, मनोहर चांदण्याची बरसात करून ! ईतर कोणत्याही ऋतूमधील चांदण्यापेक्षा या ऋतूमधील ‘चांदणे’ खूपच नयनरम्य असते. ‘शरदाचे चांदणे’ असा वाक्यप्रचार रूढ झाला अशा चांदण्याच्या सुखद अस्तित्वामुळेच ! चांदणे हे नेहमीच ‘शीतल’ असते, पण तो शरदाच्या चांदण्यातील शीतलता काही औरच असते. या चांदण्याच्या शीतलतेचाही स्वास्थ्यरक्षणासाठी आयुर्वेदाने उपयोग करून घेतला, ‘कोजागिरी पौर्णिमेच्या रूपाने !

मागच्या लेखात या ऋतूमध्ये पित्तदोष वाढतो व त्यामुळे अंगाची आग होणे, रक्तस्त्राव होणे आदी आजार बळावतात, असा उल्लेख आपण पाहिला होता. बाह्य वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढते. अशा वाढलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी उत्तम उपयोग होतो तो ‘दुधाचा’. दूध शीतल, उत्तम पित्तशामक असा आहारातला पदार्थ. म्हणूनच त्याचे सेवन या ऋतूमध्ये अत्यंत उपयुक्त असते. दुधाच्या पित्त कमी करण्याच्या कामाला आयुर्वेदाने जोड दिली, ती चांदण्याच्या शीतलतेची ! शरदाच्या चांदण्याच्या शीतलतेचा आपल्या शरीरावरही अनुकूल परिणाम घडतो. त्यामुळे दिवसा सूर्यसंतापामुळे वाढलेली उष्णता कमी व्हायला उपयोग होतो. या ऋतूत संपूर्ण आकाश चांदण्याने न्हाऊन निघालेले असते. अशा चांदण्यात दुधाचे सेवन म्हणजे आरोग्यरक्षणाकरता ‘दुग्ध-शर्करा’ योगच ठरतो. असे दूध घेताना त्यात भरपूर साखर घालावी. कारण साखर ही सुद्धा उत्तम पित्तशामक, शीतल अशी आहे. त्याचप्रमाणे बदाम, खारीक, पिस्ता असे पदार्थही दुधात घालावेत. या पदार्थांमुळे दिवसाच्या उष्णतेने आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. शिवाय दुधाच्या ‘पौष्टिक’ कार्यालाही चांगलाच हातभार लागतो. वेलदोड्यासारखे पदार्थ पित्तशमनाबरोबरच दुधाला उत्तम सुगंध देण्याचेही काम करतात. दूध घेताना चांगले तापवून घ्यावे. कारण असे दूध पचण्यास हलके होते. चांगले तापवलेले दूध मग चांदण्यात निववण्यासाठी ठेवावे आणि नंतर त्याचा पिण्यासाठी उपयोग करावा. यामुळे चांदण्याच्या शीतलतेचा दुधावर अनुकूल परिणाम घडतो. म्हणूनच असे चांदण्यात घेतलेले दूध शरद ऋतूमधील पित्ताचे आजार कमी करायला उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे उकाड्यामुळे शरीराला येणारा थकवा दूर करून तजेला आणते.

हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, यासाठी आयुर्वेदाने उपयोग करून घेतला, तो ‘कोजागिरी पौर्णिमा’ या दिवसाचा. या परंपरेच्या निमित्ताने आयुर्वेदातील शरद ऋतुचर्येचा अवलंब व्हावा व आपल्या सगळ्यांचे आपोआप आरोग्य राखले जावे, हा या कोजागिरी पौर्णिमेचा खरा ‘शास्त्रीय’ हेतू आहे. अर्थात, याचा अर्थ केवळ त्या दिवशीच चांदण्यात दूध प्यावे असा नाही. संपूर्ण शरद ऋतूमध्येच अशा प्रकारे दूध घेणे ‘ठरते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अशा ऋतुचर्येची आठवण उपयुक्त होणे अपेक्षित असते.

या ऋतूमधील चांदण्याप्रमाणेच नक्षत्रासंदर्भातही एक विशेष उल्लेख ग्रंथात आढळतो. पावसाळ्यात नदी, तलाव यांतील पाणी गढूळ झाल्यामुळे तसेच्या तसे पिण्यास अयोग्य असते. ऑक्टोबरपर्यंत मात्र, हे पाणी बरेचसे निवळते. चांदण्यांच्या प्रकाशात हे पाणीसुद्धा गार होते. चांदण्याप्रमाणेच आकाशातील नक्षत्रांचासुद्धा या पाण्यावर परिणाम घडत असतो. त्याचाच परिणाम म्हणजे पाणी ‘शुद्ध’, पिण्यास योग्य बनते. आकाशात याच सुमारास ‘अगस्ती’ ताऱ्याचा उदय होतो. या ताऱ्याच्या प्रकाशात तलाव, नदी यांतील पाणी अधिकच निर्मळ, शुद्ध बनते. अशा पाण्यालाच आयुर्वेदाने ‘हंसोदक’ असे नाव दिले आहे. हंसाप्रमाणे निर्मळ किंवा हंसपक्ष्यास उपयुक्त असे ‘शुद्ध’ पाणी म्हणजे ‘हंसोदक !’ याच हंसोदकाचा वापर स्नान, पान आदी सर्वांसाठी करावा, असा उल्लेख ग्रंथात सापडतो.

मित्रांनो, शरद ऋतुचर्येमधलं पाण्याचं हे वर्णन सांगताना मला एक वेगळा मुद्दा सांगायचा आहे. हल्ली आयुर्वेदावरील कोणत्याही व्याख्यानात, समारंभात, लेखनात जो तो ‘आयुर्वेदात संशोधन व्हायला हवं’ असं बिनधास्त सांगतो. आयुर्वेदाने मूलभूत सिद्धांत मुळातच इतके पक्के होतात की त्यात संशोधन होणे थोडे अशक्य वाटते. मग संशोधनाच्या जागा आहेत, त्या अशा शरद ऋतूमधल्या पाण्यासारख्या ! आज कोणत्याही गोष्टीचे पृथ:क्करण केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, केमिकल ॲनालिसिस आदी आधुनिक शास्त्रांद्वारे करता येते. मग त्यांचा उपयोग शरद ऋतूत नक्षत्रांमुळे ‘निर्विष’ होणाऱ्या पाण्याच्या पृथक्करणासाठी करता येईल. मूळचे दूषित पाणी व चांदण्यात ठेवलेले तेच पाणी या दोन्ही पाण्याच्या नमुन्यांचे परीक्षण करून नक्की निर्विषता, शुद्धत्व म्हणजे काय घडते, असा ‘संशोधनपर’ अभ्यास करणे सहज शक्य आहे. पूर्वाचार्यांनी केलेले हे निरीक्षण आधुनिक शास्त्रांच्या साह्याने ‘कागदावर’ दाखवता येईल. हे करताना आयुर्वेद किंवा अर्वाचीन शास्त्रे यांच्या तत्त्वांना धक्का न लागता, त्यांच्यात भेसळ न करता योग्य असा समन्वय त्यांच्यात साधता येईल. आयुर्वेदाला आधुनिकतेची जोड देता येईल, ती अशा प्रकारे.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

2